मुंबई: राज्यातील राजकीय घडामोडींनी पुन्हा एकदा वेग घेतला असून विविध पक्षांतील अंतर्गत वाद, आरोप-प्रत्यारोप आणि संभाव्य पक्षांतरामुळे वातावरण तापले आहे. एकीकडे शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची चिन्हे दिसत असताना, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. मराठा आंदोलकांशी संबंधित वादग्रस्त पोस्टमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे, तर वनखात्यावरील आरोपांमुळे सत्ताधारी गटातही तणाव निर्माण झाला आहे.
ठाकरेंचा शिलेदार शिंदे गटाच्या वाटेवर?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील जळगाव जिल्ह्यातील एक प्रभावी नेता शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या शुक्रवारी हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. संबंधित नेत्याचे नाव अद्याप गुप्त ठेवण्यात आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने ठाकरे गटात नाराजीचे वातावरण आहे. ग्रामीण भागात पकड सैल होत चालली असून शहरी भागातही पक्षाची ताकद घटल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित नेत्याने आपले राजकीय भवितव्य लक्षात घेऊन शिंदे गटाशी संपर्क साधल्याची माहिती मिळते.
अमोल मिटकरींमुळे राष्ट्रवादी अडचणीत?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षमध्ये अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. आमदार अमोल मिटकरी यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पक्ष अडचणीत आल्याची टीका प्रदेश उपाध्यक्ष मदन भरगड यांनी केली आहे. मिटकरी यांनी पक्षातील नेत्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे काम केल्याचा आरोप भरगड यांनी केला.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर मिटकरी यांनी व्यक्त केलेल्या संशयावरून हा वाद उफाळला आहे. चौकशीबाबत असमाधान व्यक्त करत त्यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत अंतर्गत संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मनोज जरांगे पाटील यांना धमकीची पोस्ट व्हायरल
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना उद्देशून समाजमाध्यमांवर धमकीवजा पोस्ट व्हायरल झाल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. “धनंजय मुंडे यांच्या केसालाही धक्का लागला तर कार्यक्रम खल्लास” अशा आशयाचा मजकूर या पोस्टमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय गोविंद फड यांच्यावर आरोप होत आहेत. तसेच भाजप आमदार सुरेश धस यांनाही इशारा देण्यात आल्याची चर्चा आहे. या पोस्टनंतर जरांगे समर्थक आणि मुंडे समर्थकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे.
श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांवर गंभीर आरोप
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या वनखात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वनविभागाकडे निधीअभावी जंगलातील सागाची झाडे तोडून विक्री करण्याची तयारी सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.या आरोपामुळे वनमंत्री गणेश नाईक यांच्या कारभारावर टीका होत आहे. नवी मुंबईतील ऐरोली येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना शिंदे यांनी वनविभागाच्या निर्णयक्षमतेवर उपरोधिक टीका केली.
भाजपाच्या ‘विभाजनाच्या राजकारणा’वर काँग्रेसची टीका
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी भाजपावर धर्माच्या आधारावरील राजकारण केल्याचा आरोप केला. कोकण विभागातील निवासी कार्यशाळेत बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले.
राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे हात मजबूत करण्याचे आवाहन करत त्यांनी पराभवाने खचून न जाता पक्षबांधणीवर भर देण्याचे सांगितले.राज्यातील या सर्व घडामोडींमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणांना कोणते वळण मिळते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.