जालना : बीड जिल्ह्यातील परळीतील प्रचारसभेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची आठवण काढल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. “आज एक व्यक्ती आपल्या सोबत नाही, याची जाणीव होते,” असे धनंजय मुंडे यांनी म्हटले होते. आता धनंजय मुंडे यांच्या विधानावर मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार टीका केली आहे.
मनोज जरांगे म्हणाले, ‘ते असे काही बोलले असतील तर त्यांच्यासारखा नीच माणूस दुसरा कोणी नाही. संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करून त्याला उणीव भासत असेल तर त्या धन्या इतका नीच माणूस या पृथ्वीतलावर असूच शकत नाही. तो मित्र असो किंवा सोयरा असो. जर त्याने वाईट कृत्य केले असेल तर त्याचे कधीच समर्थन करायचे नाही. अजित पवार यांचे आता तरी डोळे उघडले पाहिजे. धनंजय मुंडे यांना किती पाठीशी घालणार आहात? अजित पवार यांचे डोळे अजूनही उघडले तर बरे होईल. गोरगरिबांचे मुडदे पाडणाऱ्यांना अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी किती पाठीशी घालायचं? शब्दातून का होईना धनंजय मुंडे उघडे पडले आहेत. गुंडगिरी, भ्रष्टाचार करणे, लोकांच्या जमिनी हडपणे, दारू पिऊन पोरांना त्रास देणे, त्यांच्या समाजातील काही लोकांना गुन्हेगारीकडे वळून, ब्लॅकमेल करून आपला संसार मोठा करायचा, असे भयंकर पाप कराड करत होता.’
धनंजय मुंडे हे गुंडगिरीमधून राजकारण उभं करत होते, असा माणूस अजिबात चांगला नाही. इथून पुढे तरी लोकांनी डोळे उघडले पाहिजे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आता डोळे उघडले पाहिजेत. नाहीतर धनंजय मुंडे यांच्या पापात तुम्ही देखील खाक व्हाल. असा गुंड आणि टोळ्या सांभाळणारा माणूस जनतेसाठी घातक आहे. त्याला सरकारने तात्काळ जेरबंद करायला पाहिजे, माझ्या मॅटरमध्ये चल ना नार्को टेस्ट करायला, असे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना दिले आहे.
मनोज जरांगे यांचं सरकारला पत्र; माझं पोलिस संरक्षण काढा…
मनोज जरांगे नार्को टेस्टसाठी तयार, धनंजय मुंडे यांना खुलं आव्हान…
धन्या मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे; जरांगे पाटलांनी ऐकवली ऑडिओ क्लिप…
मनोज जरांगे यांचा मोठा गौप्यस्फोट; धनंजय मुंडेंकडून हत्येचा कट…