मुंबईः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही दिवसांपूर्वीच दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते दिल्लीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे एकाच आठवड्यात दोन वेळा दिल्ली जाण्यामागील कारण काय, याची चर्चा होऊ लागली होती. मात्र, देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी आले होते. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळच्या दिल्ली दौऱ्यात भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतली आहे.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
देवेंद्र फडणवीस हे दावोस आर्थिक परिषदेसाठी स्वित्झर्लंडला गेले असताना नितीन नवीन यांनी दिल्लीत एका जंगी सोहळ्यात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांना उपस्थित राहता आले नव्हते. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन अमित शहा यांना भेटले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचा हा दिल्ली दौरा गुप्त होता. तसेच त्यावेळी नितीन नवीन हेदेखील बिहारच्या दौऱ्यावर होते. परिणामी या दोघांची भेट होऊ शकली नव्हती. त्यामुळे कालच्या दिल्ली दौऱ्यात देवेंद्र फडणवीस यांनी नितीन नवीन यांची आवर्जून भेट घेतली. नितीन नवीन यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले. मात्र, नितीन नवीन यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर फडणवीस त्यांना पहिल्यांदाच भेटले आहेत. त्यामुळे साहजिकच या भेटीत महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत चर्चा झाली असू शकते. परंतू, या चर्चेचा नेमका तपशील अद्याप कळू शकलेला नाही.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अस्थिरतेचे ढग दाटले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात जोरदार चर्चा सुरु आहे. तसे घडल्यास महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलू शकतात. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. देवेंद्र फडणवीस हे वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमासाठी दिल्लीला गेले असले तरी पडद्यामागे राजकीय घडामोडी घडल्याची शक्यता नाकारता येत नाही.