मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापले आहे. पुढील काही दिवसांमध्ये जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात महापालिका निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक महत्त्वाच्या निवडणुकांबाबत आता महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
महापालिका निवडणुका या जानेवारी महिन्यातच पार पडण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ आधी पूर्ण करणे आवश्यक आहेत. जानेवारीत महापालिकांच्या निवडणुका होणार असल्यने आता पुढील महिन्यात, डिसेंबरमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता ही १५ डिसेंबरनंतर लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. महिनाभरातच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने राज्यातील राजकीय हालचालींना आता वेग आला आहे. आगामी महापालिका निवडणुका ही राज्यातील सर्व पक्षांसाठी प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे.
दरम्यान, राज्याच्या स्थानिक राजकारणात या निवडणुकांमुळे नव्या आघाड्या आणि युतीचे प्रयोग सुरू झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिंदे गटाची शिवसेना आणि ठाकरे गटाची शिवसेना एकत्र लढणार, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. पुणे जिल्ह्यात शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या एकत्र लढतीचा विषय समोर आल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे.