मॉस्कोः रासायनिक खतांच्या तुटवड्यामुळे, भारतातील कृषी क्षेत्रापुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. इराण-अमेरिका युद्धामुळे खतांच्या पुरवठा साखळीत मोठा व्यत्यय उद्भवला आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या खत पुरवठ्यात वाढ करण्यात येईल, असे आश्वासन रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सोमवारी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना दिले. भारत-रशिया व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक सहकार्य आयोगाच्या सत्ताविसाव्या सत्राचे सह-अध्यक्षपद भूषविल्यानंतर, परराष्ट्रमंत्र्यांनी क्रेमलिनमध्ये पुतिन यांची भेट घेतली.
भारतीय शेतकऱ्यांसाठी आणि कृषी क्षेत्रापुढील प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. खतांचा पुरवठा वाढवत आहोत आणि तो आणखी वाढवण्यासाठी तयार आहोत. तसेच अणुऊर्जेशी संबंधित इतर सर्व मुद्दे, उच्च-तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य आणि इतर क्षेत्रांबाबतच्या समस्यांवरही विचार चालू आहे, असे पुतिन यांनी सांगितल्याचे क्रेमलिनच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
भारत आणि रशिया यांच्यातील व्यापार उलाढालीत झालेल्या वाढीबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. चालू आर्थिक वर्षात दोन्ही देसांमधील उलाढाल वाढली आहे. गेल्या वर्षी त्यात किंचित घट झाली होती. त्याचे श्रेय प्रामुख्याने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते. ते रशिया-भारत संबंध विकसित करण्यावर वैयक्तिक लक्ष देत आहेत, असे गौरवोद्गार पुतिन यांनी काढले.
अमेरिकेच्या दबावामुळे रशियाकडून होणाऱ्या कच्च्या तेलाची खरेदी भारताने तात्पुरती कमी केली होती, परंतु इराण-अमेरिका-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ती पुन्हा सुरू केली आहे. जून आणि जुलै महिन्यांत, नवी दिल्लीने दररोज २६ लाख बॅरलपेक्षा जास्त रशियन तेल आयात केले. फेब्रुवारीमधील १० लाख बॅरल प्रति दिन या नीचांकी पातळीवरून ही वाढ झाली असून, देशाच्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीपैकी निम्म्याहून अधिक वाटा या तेलाचा आहे.
या महिन्याच्या अखेरीस किर्गिझिस्तानमधील बिश्केक येथे एससीओ शिखर परिषदेत पुतिन आणि मोदी यांची भेट होणार आहे आणि पुढील महिन्यात नवी दिल्लीत भारताच्या यजमानपदाखाली होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेतही त्यांची पुन्हा भेट होण्याची शक्यता आहे. याशिवाय वार्षिक भारत-रशिया शिखर परिषदही याच दरम्यान होणार आहे. एस. जयशंकर यांनी क्रेमलिनमधील आपल्या भाषणात या संभाव्य भेटींचा उल्लेख केला.