पुणे : हृदयातून निघून हृदयापर्यंत पोहोचलेले शब्द म्हणजे कविता असते. अशी कविता लिहिणाऱ्या प्रतिभावंत कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी चंद्रकांत वानखेडे यांनी केले.
प्रज्ञा कल्याणकर यांनी संपादित केलेल्या वल्लरी प्रकाशनाच्या ‘कण्हेर’ या एकविसाव्या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन समारंभात वानखेडे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ गझलकार म.भा.चव्हाण, अभिनेत्री सुप्रिया कुलकर्णी, समर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष किरण इनामदार, वल्लरी प्रकाशनाच्या सल्लागार मानसी चिटणीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वानखेडे होते. यावेळी बोलताना वानखेडे यांनी बहारदार कवितांचे सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली.
‘कण्हेर’मध्ये एकूण दहा कवी-कवयित्रींचा समावेश आहे. त्यामध्ये हर्षल कापुरे (धुळे), महेंद्र आखाडे (धुळे), मदन मोदी (मुंबई), अश्विनी भागवत (नागपूर), अर्चना पाटील (अलिबाग), रेवती सोनटक्के (पुणे), सुरेखा निपसे (पुणे), डॉ. मिनल गायकवाड (लातूर), अशोक भवार (पुणे) आणि डॉ. मनोज गिमेकर (नांदेड) यांचा समावेश आहे. प्रकाशनानंतर सहभागी कवी-कवयित्रींचा काव्यमहोत्सव संपन्न झाला.
सुप्रिया कुलकर्णी यांनी सहभागी कवी-कवयित्रींचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. चव्हाण यांनी आपल्या शैलीत गझल सादर केल्या. तर इनामदार यांनी वल्लरी प्रकाशनाच्या ‘स्वर मोगरा’ या म्युझिक अल्बमविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा कल्याणकर तर प्रास्ताविक ज्योती मनोहर यांनी केले. आरती परळकर यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.