नवी दिल्लीः दिल्लीतील १९८४ च्या शीखविरोधी दंगल प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार, यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) तीन खासदारांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. दिल्लीतील भाजपच्या या तीन खासदारांच्या कृतीला पक्षात आणि पक्षाबाहेरून तीव्र विरोध होत आहे.
दिल्लीतील भाजपच्या रामवीर सिंग बिधुरी (दक्षिण दिल्ली), योगेंद्र चंदोलिया (वायव्य दिल्ली) आणि कमलजीत सेहरावत (पश्चिम दिल्ली) या तीन खासदारांना या कारवाईचा फटका बसला आहे. त्यांनी अलीकडेच १९८४ च्या दंगलीतील दोषी आणि काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन शोक व्यक्त केला होता. सज्जन कुमार यांचे २० ऑगस्ट रोजी निधन झाले आहे.
शीख दंगलीतील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ लढा देणारे आणि अलिकडे भाजपमध्ये सामील झालेले ज्येष्ठ वकील एच. एस. फुलका यांनी या तीन खासदारांच्या कृतीवर तीव्र टीका केली आहे. ते म्हणाले, की भाजपने १९८४ च्या पीडितांना नेहमीच पाठिंबा दिला आहे आणि सज्जन कुमार यांना तुरुंगात ठेवण्यासाठी न्यायालयीन लढा दिला आहे, अशा परिस्थितीत पक्षाच्या खासदारांनी हत्याकांडातील दोषीच्या घरी जाऊन शोक व्यक्त करणे हे लज्जास्पद आहे. या तीन खासदारांवर पूर्णपणे बहिष्कार टाकण्यात यावे, असे आवाहन फुलका यांनी जनतेला केले आहे.
वाढता वाद आणि शीख समुदायाच्या रोषाच्या पार्श्वभूमीवर, भाजप नेतृत्वाने या प्रकरणी कठोर भूमिका घेतली आहे. पक्षातील सूत्रांनुसार, भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन यांनी तीन खासदारांना कडक शब्दांत फटकारले असून, आपली नाराजी व्यक्त केली आहे.
पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट करताना भाजपचे प्रवक्ते आर. पी. सिंह म्हणाले, की हे तीन खासदार पक्षाचे प्रतिनिधी म्हणून नव्हे, तर पूर्णपणे त्यांच्या ‘वैयक्तिक क्षमतेने’ सज्जन कुमार यांच्या घरी गेले होते.
दुसरीकडे, आम आदमी पार्टीसह (आप) इतर विरोधी पक्षांनीही या मुद्द्यावरून भाजपला घेरण्यास सुरुवात केली असून, त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.