रायगड: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रायगड जिल्ह्यातील जासई, चिरनेर, सातिर्जे आणि चोंढी येथे प्रचार रॅलीत सहभाग घेतला आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस मविआला यश मिळेल याची खात्री व्यक्त केली.
ते म्हणाले, “हा देश मुठभर लोकांचा किंवा उद्योगपतींचा नाही, तर सर्वसामान्यांचा आहे. भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. दोन गुजराती विकत आहेत तर दोन खरेदी करत आहेत, आता तिसऱ्या मुंबईच्या नावाखाली भांडवलदार रायगडच्या उंबरठ्यावर आले आहेत. या भांडवलशाहीला थांबवण्यासाठी काँग्रेस मविआला विजयी करा.”
हर्षवर्धन सपकाळ यांनी लोकनेते दि. बा. पाटील यांची आठवण करून दिली आणि सांगितले, “लोकनेते दि. बा. पाटील यांनी भूमिपुत्रांसाठी मोठा लढा दिला होता. आता पुन्हा भूमिपुत्रांसमोर भांडवलदारांचे मोठे संकट उभे आहे. यासाठी एकसंध राहून परंपरा कायम ठेवणे गरजेचे आहे.”
एका प्रश्नावर त्यांनी नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीबाबत बोलतांना सांगितले, “काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासूनच हे मागणी केली आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांची या बाबतीत टाळाटाळ सुरू आहे. आताच विमानतळाचे एनएम नाव दिसत आहे, पण एनएमच्या आडून नरेंद्र मोदी हे नाव देण्याचा घाट घातला तर त्याला आम्ही मान्य करणार नाही.”रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत, राजाभाऊ ठाकूर तसेच काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी रॅलीत उपस्थित होते