पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधी यांचा हल्लाबोल…

Rahul-Gandhi
Share

नवी दिल्ली : पुणे शहरातील कोरेगाव पार्कमधील मुंढवा येथील 40 एकर जमीन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं खरेदी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याच मुद्यावरुन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरी करुन बनलेल्या सरकारनं केलेली जमीन चोरी असल्याचे म्हटले आहे.

पुणे शहरातील कोरेगाव पार्कमधील जमिनीची बाजारभावाप्रमाणं 1800 कोटी रुपयांची जमीन केवळ 300 कोटी रुपयांना विकण्यात आली. या शिवाय राज्याच्या आयटी धोरणाचा लाभ घेत स्टॅम्प ड्युटी देखील कमी आकारण्यात आली. स्टॅम्प ड्युटी 500 रुपये आकारण्यात आली. याच मुद्यावरुन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरी करुन बनलेल्या सरकारनं केलेली जमीन चोरी असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शांत राहणं खूप काही सांगते, असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या प्रकरणी प्रश्न विचारले आहेत.

राहुल गांधी म्हणाले, ‘महाराष्ट्रात 1800 कोटी रुपयांची सरकारी जमीन, जी दलितांसाठी आरक्षित होती, फक्त 300 कोटी रुपयांमध्ये मंत्र्यांच्या मुलाच्या कंपनीला विकण्यात आली. त्यावरील स्टॅम्प ड्युटी देखील हटवण्यात आली. म्हणजेच एक लूट आणि त्यावर कायदेशीर शिक्कामोर्तब करत सूट देण्यात आली. जे मतचोरी करुन बनलेलं सरकार आहे, त्यांच्याकडून करण्यात आलेली ही जमीन चोरी आहे. त्यांना माहिती आहे, कितीही लूट केली तरी मतचोरी करुन पुन्हा सत्तेत येऊ शकतात.
ना लोकशाहीची परवा, ना जनतेची, ना दलितांच्या अधिकारांची
मोदी जी, आपकी चुप्पी बहुत कुछ कहती है –
क्या आप इसीलिए खामोश हैं क्योंकि आपकी सरकार उन्हीं लुटेरों पर टिकी है जो दलितों और वंचितों का हक़ हड़पते हैं?
मोदी जी, तुमची शांतता खूप काही सांगते,
तुम्ही यासाठीच शांत आहात की तुमचं सरकार त्या लुटारुंवर टिकलेली आहे, जे दलित आणि वचितांचे अधिकार हिसकावून घेतात?

राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी हरियाणातील मतचोरीचा मुद्दा मांडला होता. पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात देखील राहुल गांधी यांनी मतचोरीचा मुद्दा आणला आहे.

दरम्यान, अमेडिया कंपनीकडून खाजगी एलएलपी आयटी कंपनी उभारली जाणार होती. यासाठी जी खरेदी विक्री केली जाणार होती, त्याच्या सहीचे अधिकार पार्थ पवार यांनी दिग्विजय पाटलांना देण्याचा 22 एप्रिल 2025ला प्रस्ताव ठेवण्यात आला. या प्रस्तावाची प्रत आता समोर आली आहे. या प्रस्तावानंतर 20 मे 2025 ला वादग्रस्त जमिनीचा दस्त झाला. हा दस्त दिग्विजय पाटलांच्या सहीने झाला असून पार्थ पवारांनी सहीचे दिलेल्या अधिकाराची प्रत ही सोबत जोडण्यात आलेली आहे. पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी कंपनीनं जमीन खरेदीचा व्यवहार केल्या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *