नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचा अवमान करणे हा गुन्हा ठरवण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यास मंजुरी दिली आहे. ‘प्रिव्हेंशन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर ॲक्ट, 1971’ (The Prevention of Insults To National Honour Act, 1971) या कायद्यात सुधारणा करून त्यात ‘वंदे मातरम्’चा समावेश करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
या सुधारणेमुळे ‘वंदे मातरम्’ गाताना अडथळा आणणे किंवा त्याचा अपमान करणे हा आता दंडनीय गुन्हा ठरेल. सध्या या कायद्यांतर्गत राष्ट्रगीत (जन गण मन), राष्ट्रध्वज आणि भारतीय राज्यघटनेचा अवमान केल्यास 3 वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे, तीच आता राष्ट्रीय गीतालाही लागू होईल.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
6 फेब्रुवारी रोजी गृह मंत्रालयाने (MHA) दिलेल्या सूचनांनुसार, अधिकृत कार्यक्रमांमध्ये वंदे मातरम् मधील सर्व सहा कडवी (साधारण 3 मिनिटे वेळ) गायली किंवा वाजवली जावीत. तसेच, ज्या कार्यक्रमात राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत दोन्ही वाजवले जाणार असतील, तिथे राष्ट्रीय गीताला (वंदे मातरम्) प्राधान्य द्यावे, असे म्हटले आहे. यापूर्वी गृह मंत्रालयाच्या वंदे मातरम् संदर्भातील सूचना केवळ सल्लागार स्वरूपाच्या होत्या. आता कायद्यात सुधारणा केल्यामुळे त्यांना कायदेशीर किंवा वैधानिक पाठबळ प्राप्त होणार आहे.
‘वंदे मातरम्’ हे बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी लिहिले असून 1880 च्या दशकात त्यांच्या ‘आनंदमठ’ कादंबरीत ते प्रसिद्ध झाले होते. 1937 मध्ये काँग्रेसने याच्या पहिल्या दोन कडव्यांचा स्वीकार केला होता आणि नंतर भारतीय राज्यघटनेने याला ‘राष्ट्रीय गीता’चा (National Song) दर्जा दिला आहे.