जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या नियमात मोठा बदल…

evm
Share

मुंबई : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठीच्या नियमांमध्ये राज्याच्या ग्रामविकास खात्याने एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. यापुढे ईव्हीएम बॅलेट मशीन यावर पहिला राष्ट्रीय पक्ष, त्यानंतर प्रादेशिक पक्ष मग अपक्ष उमेदवार असा क्रम असणार आहे. या क्रमानेच उमेदवारांची यादीही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ग्रामविकास खात्याने त्यासंबंधी एक जीआर प्रसिद्ध केला आहे.

या आधी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आडनावाच्या अद्याक्षरानुसार क्रमवार नावे असायची. त्यामुळे राष्ट्रीय पक्षाच्या आणि राज्य प्रादेशिक पक्षाच्या उमेदवारांची नावे खाली जायची. आता नव्या गॅझेटनुसार, राष्ट्रीय पक्षाच्या आणि प्रादेशिक पक्षाच्या उमेदवारांची नावे सर्वांत वर असणार आहेत. महाराष्ट्र शासनाने पंचायत समिती निवडणूक नियम मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करत निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि शिस्त आणण्याचा प्रयत्न केला आहे. 15 डिसेंबर 2025 रोजी ग्रामीण विकास विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची पद्धत पूर्णपणे बदलण्यात आली आहे. हे नियम तातडीने लागू करण्यात आल्याने आगामी पंचायत समिती निवडणुकांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे.

Buy Political Social Media Book Price : 350/- WhatsApp : 93712 69949
Buy Political Social Media Book
Price : 350/-
WhatsApp : 93712 69949

राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!

पंचायत समिती निवडणुकांमध्ये आतापर्यंत उमेदवारांची यादी कशी मांडायची याबाबत स्पष्ट आणि एकसंध पद्धत नव्हती. नव्या सुधारणेनुसार, निवडणूक चिन्ह वाटपानंतर उमेदवारांची यादी ठरावीक चार गटांमध्ये विभागून प्रसिद्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे मतदारांना उमेदवारांची माहिती अधिक सोप्या आणि स्पष्ट स्वरूपात मिळणार आहे.

उमेदवारांचे चार गट निश्चित
नव्या नियमांनुसार उमेदवारांची यादी पुढील चार प्रवर्गांमध्ये विभागली जाईल…
१) मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील राज्यस्तरीय पक्षांचे उमेदवार
२) इतर राज्यांतील मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पक्षांचे उमेदवार
३) राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत पण अमान्यताप्राप्त पक्षांचे उमेदवार
४) अपक्ष उमेदवार
या वर्गीकरणामुळे मोठ्या पक्षांपासून अपक्ष उमेदवारांपर्यंत सर्वांची स्पष्ट वेगळी ओळख निर्माण होणार आहे.

प्रत्येक प्रवर्गातील उमेदवारांची नावे मराठी वर्णानुक्रमानुसार लावण्याचा निर्णय हा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. उमेदवारांचे आडनाव, त्यानंतर नाव आणि पत्ता या क्रमाने माहिती दिली जाणार आहे. यामुळे नावाच्या क्रमावरून होणारे संभाव्य संभ्रम, तक्रारी आणि वाद टाळता येण्याची शक्यता आहे.

नमुना क्रमांक 3 मध्ये बदल म्हणजे काय?
राजपत्रातील अधिसूचनेनुसार नमुना क्रमांक 3 (Form III) पूर्णपणे बदलण्यात आला आहे. नव्या नमुन्यात…

प्रवर्ग
अनुक्रमांक
उमेदवाराचे नाव
पत्ता
निवडणूक चिन्ह
ही सर्व माहिती एकाच तक्त्यात देणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे सर्व प्रवर्गांसाठी अनुक्रमांक सलग ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, स्वतंत्र क्रमांक देण्यास मनाई आहे.

या बदलाचा सर्वाधिक परिणाम लहान आणि अमान्यताप्राप्त पक्षांवर होण्याची शक्यता आहे. मान्यताप्राप्त पक्षांचे उमेदवार यादीत वरच्या गटात राहणार असल्याने त्यांना दृश्यमानतेचा फायदा मिळू शकतो. मात्र अपक्ष आणि लहान पक्षांसाठी स्वतंत्र ओळख अधिक स्पष्ट होणार असल्याचा दावा शासनाकडून केला जात आहे.

दरम्यान, आगामी पंचायत समिती निवडणुकांमध्ये हे सुधारित नियम लागू राहणार असल्याने उमेदवार यादीबाबत वाद कमी होण्याची शक्यता. निवडणूक प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध होणार. मतदारांना माहिती सहज उपलब्ध होणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *