मुंबई : मुंबई महानगरपालिकेत महापौरपद आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरुन एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबईत पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौरपद आणि स्थायी समितीसह अन्य समित्यांमध्ये योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, दिल्लीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईत महापौरपदाबाबत कोणतीही तडजोड करुन नका, असा आदेश देण्यात आला होता. त्यामुळे निवडणुकीला निकाल लागून 10 दिवस उलटल्यानंतरही मुंबईत अद्याप महायुतीचा महापौर विराजमान होऊ शकलेला नाही. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी त्यांच्या साताऱ्यातील दरे गावी निघून गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
एकनाथ शिंदे हे रविवारी दुपारपर्यंत मुंबईत होते. त्यानंतर ते साताऱ्याकडे रवाना झाले. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते साताऱ्याला गेल्याचे सांगितले जात असले तरी शिवसेना-भाजप यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचीही कुजबुज रंगली आहे. भाजपकडून मुंबई महानगरपालिकेतील शिंदे सेना आणि भाजपच्या नगरसेवकांची एकत्रित गटनोंदणी करावी, असा आग्रह धरला होता. मात्र, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 29 नगरसेवकांची स्वतंत्र गटनोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे हे दरे गावात असल्यामुळे मंगळवारी राहुल शेवाळे आणि शीतल म्हात्रे हे दोघेजण शिंदे सेनेच्या नगरसेवकांना घेऊन सीबीडी बेलापूर येथील कोकण भवनात जाणार आहेत.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
राजकीय क्षेत्रात असाल तर बनवा स्वतःचे पुस्तक!
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लगेच दावोसच्या आर्थिक परिषदेसाठी परदेशी गेले होते. त्यानंतर तीन-चार दिवस मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदावरुन शिवसेना-भाजपच्या गोटात प्रचंड राजकारण रंगले होते. याच काळात एकनाथ शिंदे यांनी आपले 29 नगरसेवक हॉटेलमध्ये नेत सगळ्यांनाच धक्का दिला होता. या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. मात्र, दिल्लीतील भाजप नेतृत्त्वाने या दबावाला भीक न घालता मुंबईच्या महापौरपदाबाबत तडजोड न करण्याची भूमिका घेतली होती. यानंतर एकनाथ शिंदे यांचे 29 नगरसेवक हॉटेलमधून घरी परतले होते.
दरम्यानच्या काळात देवेंद्र फडणवीस हे दावोसवरुन मुंबईत परतले होते. सोमवारी प्रजासत्ताक दिनासाठी देवेंद्र फडणवीस मुंबईतच होते. एकनाथ शिंदे हेदेखील दुपारपर्यंत मुंबईत होते. त्यामुळे उभय नेत्यांमध्ये मुंबईचे महापौरपद आणि सत्ता वाटपाबाबत चर्चा होणे अपेक्षित होते. या दोन्ही नेत्यांची बैठक होईल, असेही सांगितले जात होते. परंतु, देवेंद्र फडणवीस हे दावोसवरुन परतल्यानंतरही काही विशेष हालचाली घडलेल्या नाहीत. त्यामुळे आज एकनाथ शिंदे आपल्या 29 नगरसेवकांची स्वतंत्रपणे गटनोंदणी करणार आहेत. यावरुन मुंबईच्या महापौरपदाबाबत आणि इतर गोष्टींबाबत भाजप आणि शिंदे सेनेत अपेक्षित एकमत झाले नसावे, अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईत रंजक आणि नाट्यमय राजकीय घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.