उल्हासनगर: महिला दिनानिमित्त समता शक्ती फाउंडेशनच्या वतीने “महिलांचे अधिकार आणि संविधान” यावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्यात्या धनश्री आशा यांनी महिलांचे अधिकार, भारतीय संविधानातील तरतुदी तसेच महिलांनी आपल्या हक्कांबाबत सजग आणि जागरूक राहण्याचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी विशेष उपस्थिती लाभलेल्या अश्विनी महेंद्र शिरसाट, जिल्हा उपाध्यक्ष, महिला मोर्चा यांनी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत समाजात पुढे येण्यासाठी प्रेरित केले.
समता शक्ती फाउंडेशनच्या संचालक जयश्री गायकवाड यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देत महिलांच्या सक्षमीकरणासाठी संस्थेचे कार्य अधोरेखित केले. तसेच संस्थापक तथा व्यवस्थापकीय संचालक अर्चना गोजमे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजन व अंमलबजावणीसाठी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली असून कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.