पुणे : रामनगर (पिंपळे गुरव) येथील श्री स्वामी समर्थ दत्त दिगंबर सेवा ट्रस्ट मंदिराच्या वतीने गेल्या १६ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या अन्नछत्र सेवा कार्याने यंदा यशस्वीपणे सोळावे वर्ष पूर्ण केले आहे. या उल्लेखनीय टप्प्यानिमित्त मंदिर परिसरात भक्तिभाव, कृतज्ञता आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अन्नदान सेवाकार्याची मुहूर्तमेढ परमपूज्य गुरुवर्य मनोज दादा वेदपाठक यांनी अत्यंत प्रतिकूल आणि खडतर परिस्थितीत रोवली होती. सुरुवातीच्या काळात आर्थिक, व्यवस्थापकीय आणि विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, श्रद्धा, समर्पण आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपेवरील अढळ विश्वास यांच्या बळावर त्यांनी या सेवाकार्याची सुरुवात केली. त्यातूनच आज एक व्यापक आणि लोकहितकारी सेवा उपक्रम उभा राहिला आहे.
गेल्या १६ वर्षांत या अन्नछत्राने हजारो गरजू, भाविक आणि नागरिकांना अन्नदानाचा लाभ दिला आहे. अन्नदान ही श्रेष्ठ सेवा मानली जाते आणि त्याच भावनेतून हे कार्य सातत्याने सुरू ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, येथे येणाऱ्या भाविकांना केवळ अन्नदानच नव्हे तर आध्यात्मिक मार्गदर्शन, मानसिक शांती आणि सकारात्मक जीवनमूल्यांचा अनुभवही मिळत असल्याचे भाविकांकडून सांगितले जाते.
श्री स्वामी समर्थ दत्त दिगंबर सेवा ट्रस्टच्या माध्यमातून भक्ती, संस्कार आणि समाजसेवा यांचा सुंदर मिलाफ साधला गेला आहे. अनेक भाविकांना अध्यात्माकडे प्रेरित करण्यासोबतच सुसंस्कारित आणि शांततामय जीवन जगण्याचा संदेशही या सेवाकार्यातून दिला जात आहे. त्यामुळे हे अन्नछत्र परिसरातील भाविकांसाठी श्रद्धा आणि सेवाभावाचे केंद्र बनले आहे.
अन्नछत्र सेवेच्या १६ वर्षांच्या यशस्वी प्रवासाबद्दल ट्रस्टचे पदाधिकारी, सेवेकरी आणि भाविकांनी समाधान व्यक्त केले. आगामी काळात ही सेवा अधिक व्यापक स्वरूपात समाजातील गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
परमपूज्य गुरुवर्य मनोज दादा वेदपाठक यांच्या प्रेरणा, मार्गदर्शन आणि सेवाभावातून सुरू झालेले हे अन्नदान कार्य आज समाजसेवा, अध्यात्म आणि मानवतेचा आदर्श ठरत असून, अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने ही सेवा भविष्यातही अधिक जोमाने आणि व्यापक स्वरूपात सुरू राहो, अशी भावना भाविकांनी व्यक्त केली.
पिंपळे गुरव येथे श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा!